Tuesday, 22 December 2015

"करत रहा !"

                              "आयुष्यात असं काहीतरी करावं की आयुष्यभर आपल्याला एकदम बाप वाटलं पाहिजे !"डबल सीट चा माझा सगळ्यात आवडता dialogue! खरंच ! बऱ्याचदा वाटतं हे नाही जमणार, ते नाही होणार ; मग अपेक्षा करणंच सोडून देतो आपण ! "समाधानी व्यक्ती हीच सुखी व्यक्ती "च्या शीर्षकाखाली पूर्णविराम देऊन मोकळे होतो. मोठ्ठं स्वप्न मोठ्ठंच राहतं आणि आपण लहान ते लहानच! का नाही घ्यायची उडी ? आपल्या comfort zone च्या बाहेर येऊन एकदाच स्वतःला आजमावून का नाही बघायचं ? फार फार तर काय होईल ? हरून जाऊ !एवढंच ना !हरणं काय असतं ते समजेल तरी ! आणि जिंकलो तर... ! हे जिंकणं म्हणजे तरी काय असतं .... फक्त एक प्रमाणपत्र, आपल्या प्रयत्नांचा पुरावा !मंजिल का असली मजा तो रास्तोमें है !try करण्यात , fail होण्यात तर खरं जगणं आहे ! खुशाल प्रयत्न करा ,निर्लज्ज होऊन हरत रहा ! पण स्वप्नाला  विसरू नका !
#KeepGoing!


करत रहा करत रहा
शब्द दोन हे स्मरत रहा

अपमानानं सलत रहा
उशीवर तळमळत रहा
दे झिडकारून जांभईला त्या
रात्र एकटा पोखरत रहा

मातून दे तू संथ बहाणे
उठू देत खडबडून तराणे
तू झुंज तू गुंज
या क्षणांना नाचवत रहा

चढव सुंदर साज आंधीचा
झळकू देत घाम चांदीचा
उगा चालू नको ,कुठे थांबू नको
उंचावरून कधी कोसळून पहा

वात करून नसेनसेची
आतून सगळा  पेटत रहा
हरू नको आता विरु नको
तू बनून काजळी उरत रहा

कर एकदा तर्र हितगुज
थुंकून दे या जगाची कुजबूज
थोडाच हो ,जरा वेडाच हो
नशेत तुझ्याच तू झिंगत रहा

करत रहा करत रहा,
शब्द दोन हे स्मरत रहा





Friday, 11 December 2015

"नभ"

                                          एका वर्षापूर्वीचा विचार करता लक्षात येतंय किती बदल होतोय आयुष्यात!
तासागणिक 'तेच आहे' असं वाटणारं आयुष्य काटे फिरवून तपासलं तर आश्चर्य वाटतं !Priorities बदलत आहेत,विचार बदलत आहेत आणि त्यानुसार वागणंसुद्धा.. म्हटलं तर नकळत ,म्हटलं तर सगळं कळून !या बदलांमुळेच आयुष्य स्थिर आहे !या सतत होणाऱ्या आणि अवचित जाणवणाऱ्या बदलांचा आपल्यावर प्रचंड प्रभाव पडत असतो ,त्यातून नवीन गोष्टी उमजत जातात पण; 'दिवसामागून दिवस चालले ,ऋतुमागूनि ऋतू ' तरीसुद्धा काही गोष्टी अगदी तशाच असतात.. आधीसारख्या ! आपल्या जवळच्या व्यक्तीशी झालेलं बोलणं म्हणा किंवा त्याच जुन्याच आठवणीवर आपलं तसंच खिदळणं म्हणा ,आपल्याला वाटणारा तोच आपलेपणा ,तीच काळजी आणि तसाच विश्वास !आपल्या secondary storage device मधल्या या गोष्टी नुसत्या प्रभावशाली नसतात तर स्वत्वाची जाणीव करून देतात. कुठेतरी केंद्रित करायला लावतात. बदलांपेक्षा हे स्थैर्य जास्त जवळचं आणि हवंहवंसं वाटतं मला !या स्थैर्यामुळेच बदलांना सामोरे जाण्याची उमेद मिळते ,दिलासा मिळतो !याची सतत जाणीव करून देणाऱ्या माझ्या आयुष्यातल्या constant लोकांसाठी ही कविता !त्यामागची भावना मृदू असल्यामुळे शब्दही असे आले असावेत…

कडांमध्ये डोळ्यातल्या
चांदण्या उतरल्या
वेचुनि त्या ओंजळीत मी
नभाशी उधळल्या

आठवांच्या चांदण्या या
देखण्या नभात
सुखावलं नभ सारं
भरून आलं मायेत

तुझं-माझं,माझं-तुझं
हे नभ एक आपलं
सोबतीचं क्षितीज आपण
क्षणोक्षणी जपलं

कधी ऊन कडत
कधी मोत्याचा पाऊस
तापलो,भिजलो
केली सगळीच हौस

विस्तारला आकार
झाले गहिरे रंगांनी
जिव्हाळ्याच्या वातावरणी
बहरले कैक अंगांनी

हरवण्याची आता
नसेल कधीच तमा
लुकलुक चांदण्यांत नभाच्या
तेही शोभेल बनुनि एक चंद्रमा !
                                                    

Thursday, 3 December 2015

"रेशिमधारा "

                             
                               त्या दिवशी रिमझिम पाऊस पडत होता.नेहमीप्रमाणे रात्री आभा laptop वर काम करत बसली होती.पावसाला अडवण्यासाठी तिने खिडकी बंद केली.तीन-चार वेळा जांभई आल्यावर तिने कॉफी घ्यायचं ठरवलं. गरम गरम कॉफी ओतताना नकळत नजर अंगणात बरसणाऱ्या पावसाकडे गेली.हातात मग घेऊन आभा दाराशी उभी राहिली. माळेतला एक एक मोती तुटत जावा तसे थेंब आभाळातून निखळत जमिनीजवळ येत होते. पुन्हा पुन्हा कोलांट्या मारत रुजत होते.काही प्राजक्ताच्या पाकळीवरून ओघळून गेले तर काही पानांना बिलगून अलगद विसावले. काही थेट उतरले...कोणालाही disturb न करता!सगळ्या थेंबांना मातीनं जणू उराशी कवटाळलं होतं. आणि त्या मायेचा गंध सगळीकडे पसरला होता.या पावसाचं आभाला फार कौतुक वाटलं.कॉफीच्या वाफांनी मात्र केव्हाच कंटाळून हवेत धूम ठोकली होती .आभाचं लक्षच नव्हतं. डोळे दृश्य साठवण्यात,श्वास सुगंध वेचण्यात दंग झालेले. या दोघांमुळे हृदयाचे ठोकेसुद्धा आपलं अस्तित्व दाखवत होते.बाहेरच्या जगासारखं आता आत भावविश्व भिजत चाललं होतं. त्याची ओल आभाला जाणवायला लागली. दूर कुठेतरी शून्यात बासरीचा आवाज विरत चालल्यासारखा तिला भास झाला. अंतर्मनात स्वर उमटत होते.
'रैना बीती जायेSSS ..........'
आभाने गच्च डोळे मिटले. त्या शून्यातल्या सुराच्या दिशेने तिचा आतल्या आत प्रवास सुरु झाला.मग गाणं तसंच्या तसं ऐकायला येऊ लागलं.
'श्याम ना आये'
"यातलं 'आ 'मला म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं !"तिच्या मनात विचार आला.स्वतःजवळ येऊन पोचली तेव्हा आज दुपारी ऑफिस मध्ये झालेला संवाद आठवला.

"आपलं पटतच नसेल तर आता पुढे वाढवण्यात मला काही अर्थ वाटत नाही"
"तू समजून घे विहंग !"आभा कळवळून बोलली.
"काहीही समजायचा कंटाळा आलाय मला आता!I am fed up now!तुझे मूड्स,तुझ्या तक्रारी,तुझे explainations!मला नकोसं झालंय. माझा विचारच होत नाही आपल्यामध्ये!"
"विहंग,माझ्यावर कामाचा खूप ताण आहे !तू असा का वागतोस !"आभा चिडून म्हणाली.
"मलाही काम आहे आभा !पण मी तुझ्यासारखी नाटकं नाही करत !वेळ द्यायला जमत नसेल तर वचनं का देतेस फुकटची !"विहंगचा पारा चढला होता.
"मला नाही असं बोलता येत ,मला कळतच नाही …. "
"तुला काहीच नाही कळत!Better way ,आपण आता पुढे जायला नको !"
"तुझं पक्कं ठरलंय तर मग !"आभाने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. विहंगने नजर टाळली. समोरच दीपा बोलणं ऐकत्येय लक्षात आल्यावर विहंगने "करतो text "असं काहीबाही बोलून तेथून पलायन केलं . आभा दीपासमोर उगाच हसून निघून गेली.
                         


                         सरींचा नादमय खेळ चालूच होता.आभाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.तिने whatsapp वर विहंगचं थोड्या वेळापूर्वीचं 'last seen 'बघितलं. "कुठे केला मेसेज त्यानं मला,किती काळजी आहे ते कळतच आहे !"आभा स्वतःशी बोलून गेली.कॉफी आटोपून तिने laptop बंद केला आणि सरळ झोपायला गेली. डोळे मिटले तेव्हा 'रैना बीती जाये ' वाजत होतं. 'शाम को भूला,शाम का वादा रे … ' ! एकदा,दोनदा अगदी तसंच्या तसं तिला ऐकू आलं ."इतकं आठवतं मग म्हणता का नाही येत " तिला क्षणभर वाटून गेलं.डोळे मिटलेल्या अवस्थेत तिने हळूच गाण्याचा प्रयत्न करून पहिला.
"शाम को भूला,शाम का वादा रे....विसरलाच वादा शाम काय करायचं !hmm... पुढंचं काय बरं ? "आभा उगाच हसली.
"अगं !संग दियेके जागे है राधा !"नीता मावाशीने बरोब्बर गाऊन दाखवलं.
"अगं !मावशी !तू इतक्या रात्री जागी ?ये ना !काही हवं होतं का ?"
"नाही काही नकोय !तुझा चालू देत रियाज !"
"रियाज कसला !काहीही हा !मला कुठं येतं गाणं म्हणायला तुझ्यासारखं !"
"निंदिया ना आये ,निंदिया ना आSSSये....रैना बीती जाये" मावशीने  continue केलं .
"अहाहा !ती  'आ ' ची जागा किती सुरेख घेतेस गं !गोड गातेस खूप "
"हो ते मी गातेच !तुझी आई माझ्याहून गोड गायची !"
"हो?मग मला का नाही येत असं !"आभा खट्टू होऊन बोलली.
"कारण तुझ्या बाबांचा आवाज भसाडा category मधला होता एकंदरीत !"मावशीने हसत हसत सांगितलं.
"अरेरे !हे काही बरोबर नाही मावशी !"
"बरोबर तर बरंच काही नाहीये "मावशीने थेट नजर देत म्हटलं.
"म्हणजे ?"
"म्हणजे रात्री laptop वर कामात busy असणारी तू अशी उशीवर झोपून गाणं आठवतेस काय ,चक्क म्हणतेस काय...म्हणून म्हटलं !"
"अगं कामच करत होते… हे आपलं असंच सहज गं!"आभाने सावरून घेतलं .
" अच्छा !सगळं ठीकाय ना गं ?"
"हो !उत्तम !"
"पक्षी येत नाहीत अंगणात आजकाल !"
"त्याचं होय !अगं तसं काही नाही.ऑफिसमध्ये होते भेट आणि आता लोड आहे खूप,मग वेळ नाही मिळत!"
"मग काम झाल्यावर भेटत नाही ?थोडासा वेळ असतोच !बोलावायचं त्याला कधी कॉफी घ्यायला!पाच दहा मिनिटांनी काही फरक नाही पडत !"
"त्याला वाटलं तर तो येईल ना !तसं तो मला बोलू किंवा विचारू शकतो.तेवढं relation आहे आता आमचं !"
"त्याला कळत नाही हा मुद्दाच नाहीये !तू आपलेपणाने बोलावतेस का ?सगळ्यांना सगळं कळतच असतं आभा !पण कळत असणारे,माहित असणारे शब्दच बोलून दाखवले तर कुठं बिघडतं!"
आभा गंभीर झाली .
"या थेंबांनाच बघ !एकदा मातीवर पडले म्हणून पुन्हा ते येत नाहीत ?पुढच्या सरीमुळे ती ओल अजूनच वाढते.घट्ट रुजते खोलवर !भिजणं मातीला ठाऊक,बरसणं थेंबाना ठाऊक पण व्यक्त नाही झालं तर नात्याचा सुगंध पसरेल तो कसा ?घुसतंय ना ?"
"हो !पण हे माझ्या एकटीबाबत नाहीये !त्यानंही यायला हवंय !"
"तू हात पुढे करून तरी बघ !उशीवर गाणं म्हणून काय होणारे !"
"तू पण ना मावशी !जा आता तुला उशीर होतोय !मला खूप काम आहेत "आभा खोटं खोटं बोलली .
"अच्छा !करा ,करा काम !महत्वाची आधी करा हो !"मावशी हसत निघून गेली.

                          आभाने लगेच phone हातात घेतला. विहंगची chat window open च होती . तिने type करायला सुरुवात केली तेवढ्यातच विहंगचा मेसेज आला.
"आभा ,sorry !"
"एक शब्द बोलू नकोस ,फक्त ऐक !तू मला हवा आहेस विहंग !माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर ........! "
आणि मग त्या रात्री बराच "पाऊस" झाला ! ;)

                                                                                               -इतिश्रुती