Sunday, 12 May 2019

"तंत्रज्ञान आणि मी"

            नुकताच ११ मे ला "जागतिक तंत्रज्ञान दिवस" साजरा झाला. तंत्रज्ञानाशी व्यावसायिक तशीच मानसिकरित्या मी जोडली गेलेली आहे. अर्थात सगळेच आहेत असं मला वाटतं . सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी तंत्रज्ञाना च्या प्रगतीमुळे साध्य झालेल्या गोष्टींशी आपण जोडले गेलेलो असतो . त्याशिवाय आजच्या जगात इतकं सोयीस्कर जगणं शक्य नव्हतं .तेव्हाच माझा रोज वापर असणारा फोन खराब झाला आणि निमित्त झालं .. ब्लॉग लिहिण्याचं ! तब्बल वर्षभराने लिहीत आहे आज . नको दोष तंत्रज्ञानाला ! हा ब्लॉग पण त्यामुळेच लिहता येतोय. योगायोग की माहित नाही ... मी इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH ही प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आनंद नाडकर्णी यांची संस्था आहे ) यांचा "वेध" या कार्यक्रमातील अच्युत गोडबोले यांचं भाषण ऐकत होते आणि मला त्यांची खूप मतं पटली. तुम्हाला ऐकायचं असेल तर जरूर  "Achyut Godbole - Clearing the perspective of self" You tube वर पहा.
तर मुद्दा असा की तंत्रज्ञान , त्याचं शिक्षण , भारतातली अभियांत्रिकी च्या पोरांची अवस्था ... काही चांगल्या काही आंबट कथा याच्याबद्द्ल ऐकलेलं , अनुभवलेलं सगळं डोकयात सुरु झालं , तेव्हा विचार आला हे सगळं लिहून काढूया. म्हणून हा प्रयत्न.

         पूर्वी सगळे शाळा संपली की शिक्षक व्हायचे , BEd करायचे तसं सगळे आता अभियांत्रिकी करतात. मुख्य आपल्याला व्हायचं काय आहे आयुष्यात याची कल्पना नसते तेव्हा सरसकट सगळे मिळेल त्या शाखेला मिळेल त्या महाविद्यालयात  अभियांत्रिकीला जातात. अभियांत्रिकी नक्की काय आहे याची समज बोटांवर मोजल्या जाण्या इतक्या लोकांना असते. आणि यासाठी मुलांना ,पालकांना दोषी मानणं कितपत बरोबर आहे हा प्रश्न आहे. मागे भारताने जशी हरितक्रांती , दुग्धक्रांती अनुभवली तशी नव्या देशात IT क्रांती झाली , किंबहुना होत आहे आणि होत राहील असं म्हणण्यात काहीच वावगं वाटत नाही. जिथे ज्ञान आहे पैसा आहे असं क्षेत्रात आपण काम करावं असं वाटणं हे चूक नाही. मग  "पहले हमने science लिया फिर science ने हमारी लेली" ,"जिंदगी की बडी मिस्टेक इंजिनीरिंग की " वगैरे घोषवाक्य सुरु होतात , प्रत्यक्ष अभियांत्रिकी कॉलेजमध्येच, त्याच विद्यार्थ्यांकडून !याची कारणं काय असावीत याचा विचार करता येईल.

          काही लोकांना अभियंते करतात काय/ असतात काय माहिती नसतं मग "आम्हाला नाही आवडत तसं संगणकासमोर तास तास बसून काहीबाही लिहीत बसायचं" या निसर्गवेड्या म्हणवणाऱ्या आणि स्वतःला पुराणमतवादी म्हणून मिरवणाऱ्या मुलीही बोलायला कमी नसतात. काही नावं ठेवणारी जुनी माणसे "आजकाल काय कोणीही अभियंता होतं", "पडून असतात लाखोंनी डिग्री घेऊन असेच" मग "एम टेक करावं लागतं , त्याशिवाय नुसत्या बी टेक ला कोणी कुत्रा विचारात नाहीत " ही मध्यम वयीन लोकांची संकल्पना . खूप नवल वाटतं आणि कळतं आपल्याकडे कसे विचार रुजलेले आहेत समजात. आणि पाया हा आहे तरीच इमारत अशी आहे यात नवल वाटण्यासारखं काही उरत नाही.

           भारतात IT मध्ये खूप कंपन्या आहेत ज्या बाहेरील देशातील कंपन्यांचे "सर्विस आणि मेंटेनन्स" डिपार्टमेंट सांभाळतात. आणि त्यांचं काम मान्य आहे एकसुरी असतं. कामाचा ताण असतो , वेळ जास्त असतो. पण या सगळ्या लोकांच्या "टीम वर्क" मुळे तिथली कंपनी इतर गोष्टींमध्ये वेळ देऊ शकते आणि शेवटी जगाला ते तंत्रज्ञान वापरता येत असतं. कोणाचीही मेहनत वायफळ नाही जात आहे जर आपण या गोष्टीचा जागतिक विचार केला तर लक्षात येईल . आपल्याला जे येतंय , जे शिकायची इच्छा आहे त्यात पूर्ण झोकून देऊन काम करणं आणि स्थिर आयुष्य जगणं अशी अपेक्षा मला चूक वाटत नाही.  पण होय ते मनापासून असायला हवं. त्यातली सगळी माहिती असायला हवी.भारताच्या अर्थव्यवस्थेवर यामुळे परिणाम होतोय . शेकडो उलाढाली चालतात आणि देशाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे माहिती नसताना असं बोलणं मला पटत नाही.

           असंही आहे की खूप लोकांची रुची अभियांत्रिकीच्या शिक्षण पद्धतीमुळे जाते; किंवा त्यांना या पद्धतीमुळे किंवा ते ज्या महाविद्यालयामध्ये शिकतात तिथल्या वातावरणामुळे त्यांना खरी गोम कधी कळत नाही. मी अशा खूप लोकांना दुसरं अमकं क्षेत्र का चांगलं आहे यावर बोलताना पाहते. माझ्या मते कुठली ही गोष्ट किंवा विषय दोन तीन पातळी खोलवर जाऊन अभ्यासला तर तो सुंदरच असतो. एका व्यक्तीला कितीतरी विषय आवडू शकतात. आणि तो त्यांचा अभ्यास करू शकत असतो. तेव्हा द्राक्षांबद्दल बोलणारे कोल्हे पहिले की वाटतं अरे यार थोडा समंजसपणे ,डोळसपणें  विचार कर.उद्या नॉन-टेक्निकल क्षेत्रात काम करताना या अभियंता लोकांनी बनवलेलं एखादं उपकरण न वापरता तुझं टार्गेट संपणार आहे का याचा.



           खरं संगणकामुळे बोलायचं झालं तर माझ्या मते आज प्रत्येकाने मजा म्हणून का होईना एक प्रोग्रामिंग ची भाषा शिकली पाहिजे . त्याने विचार करायची क्षमता वाढते असं स्टिव्ह जॉब्स म्हणून गेला कारण Programming is nothing but machine way interpretation of  our thinking in Human brain .संगणकाला विचार करता येत नाही पण ते आपल्याला विचार करायला शिकवतं . मी CS निवडताना असा विचार केला होता की संगणकाचं शिक्षण हे ग्लोबल आहे. कुठे ही जा ते वाया जाऊ शकत नाही. एका यंत्रा समोर बसून तुम्ही किती लोकांची आयुष्यं नियंत्रित करत असता तुम्हाला सुद्धा माहिती नसतं. आणि खरंच कुतूहल असणाऱ्या लोकांना हे माहित आहे सॉफ्टवेअर इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा मदतीसाठी वापरलं  जातं .मला सांगा, संगणकाचा शोधच मुळात मानवाची मदत करणारं यंत्र बनवायच्या मानसातून लागला गेला असताना ते स्वाभाविक नाही का ! कला, मानवता, पर्यावरण आणि विज्ञान अशा क्षेत्रात सुद्धा तंत्रज्ञान वापरलं जात आहे ,
याबद्दल काही करावं असा प्रत्येक खऱ्या अभियंताचा मानस असला पाहिजे. शाळेत गणित आणि विज्ञानावरच लक्ष द्या म्हणताना शिक्षकांनी यांचा इतर विषयांना फायदा कसा होईल , सार्वजनिक आरोग्य ,समाजशात्र ,अर्थशास्त्र सारख्या विषयांमधली आव्हाने गणिताच्या सूत्रांनी  कशी सोडवावीत याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि सध्या जे काही आधुनिकीकरणाला उठ सूट नाव ठेवायचे प्रकार पाहायला मिळतात ते थांबवून , या क्रांतीला आपलसं कसं करता येईल , यामध्ये वेगळं काय मांडता येईल यांचा विचार BE झालेल्या मुलांनी केला पाहिजे.

           आता मग तो भारतात करायचा की भारत बाहेर जाऊन हा प्रश्न येतो. आपण जिथून आलो त्या समाजाला आपला . फायदा करून द्यावा हे नक्कीच बरोबर आहे . इतर देशांपेक्षातंत्रज्ञानामध्ये प्रगतीची आपल्याला जास्त गरज आहे कारण सोप्पंय लोकसंख्याच एवढी आहे. आपली "IRCTC" किंवा "ST" महामंडळाची वेबसाईट पाहून इतके नवीन आयआयटी काढून काय फायदा असं वाटल्याशिवाय राहत नाही. आयआयटीच्या मुलांची "ग्रीन कार्ड" साठीची धडपड पाहून पण तसंच वाटतं जेव्हा अभियंता काय कोणीही होतं म्हणणारे लोकं पाहून वाटतं . हे क्षेत्र खूप जागतिक आहे. नवीन आहे. आणि मानवाच्या प्रगतीसाठी आहे अशी सकारात्मक विचारसरणी सर्वांची असावी असं मला वाटतं.आधुनिकीकरण आणि सांगणिकीकरण यांना नाव ठेवताना नाण्याच्या दोन बाजू असतात आणि जुन्या विचारांना चिकटून इतर देश प्रगती करत नाहीयेत ही गोष्ट बोलणाऱ्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. बदलाला सामोरे जाऊन तो स्वीकारण्यात शहाणपण आहे. प्रत्येकाचा आदर करण्यात आहे. दुर्दैवाने भारतातली व्यवस्था या सगळ्याला कारणीभूत आहे पण खोलवर विचार केला तर सगळं सुटण्या सारखं आहे. IT industry मधल्या ,अभियांत्रीकी शिक्षण पद्धतीमधल्या त्रुटी आणि विचारांमधली दरी जोवर कमी होत नाही, तोवर सगळं अवघड आहे. पण पुणे आणि बंगलोर मध्ये असणारे "स्टार्ट अप्स" जे भारताचे आहेत , ज्यामुळे आपली बुद्धी आणि कष्ट वापरात येत आहेत त्याच्या कडे पाहून दिलासा वाटतो.आपण बनवलेले "प्रॉडक्ट्स" आपण च वापरावेत आणि इतरांना द्यावेत असं वाटणारी लोक पाहून हुरूप येतो . भारतात काही कंपन्या यावरचं ज्ञान वाढावं, प्रेरणा यावी म्हणून स्पर्धा ,कॉन्फरेन्स आयोजित करत आहेत आणि खरं तंत्रज्ञान जाणणारे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन अशा योजनांमध्ये सहभागी होत आहेत हे बघायला मिळतं . याचीच आज खरी गरज आहे  .सगळ्या अभियंताना योग्य ती समज  यावी आणि इतर क्षेत्रातील लोकांनी नाक न मुरडता आदर करायला लागावं असं भविष्य अपेक्षित आहे.

शेवटी म्हणू वाटतं

ओ मीर-ए-कारवाँ

ले चल मुझे वहा

ये रात बने जहाँ सुबह

ओ मीर-ए-कारवाँ !

4 comments:

  1. उत्कृष्ट मांडणी...तंत्रज्ञान भविष्य आहे हे नक्कीच फक्त सर्वांना त्याचा उपयोग शिकता आला पाहिजेल.

    ReplyDelete
  2. छान लिहिलंयस!

    भारतात नोकरी मिळवण्याची पात्रता आणि त्यासाठी लागणारं शिक्षण हे trend काळाप्रमाणे बदलत गेलं.
    १९६०-७० : किमान मॅट्रिक केलं की नोकरी मिळते
    १९७०-९० : किमान (ग्रॅज्युएशन) पदवी हवी
    २०००-२०१० : किमान इंजिनीरिंग/मेडिकल मध्ये पदवी जरुरी
    २०१०-२०२० : परदेशात उच्च शिक्षण हवेच (MS / MBA)

    पुढे IoT,AI - ML, Drones चा काळ असेल.
    ऑनलाइन tutorials हे माध्यम आज कुठल्याही ट्युशनपेक्षा मजबूत वाटते.
    एकंदरीत जर काळाची गरज ओळखायला शिकलं तर कोणीही तरुण त्याची स्वप्ने align करू शकतो आणि स्वतःसोबत राष्ट्राचा आणि परिणामी जगाचा उद्धार करू शकतो.

    कारण तंत्रज्ञान हे सदैव प्रगत होत राहील, त्याचा ग्रोथ-पॅटर्न समजला म्हणजे मिळवलं.

    ReplyDelete