Saturday, 28 November 2015

"मी"

                          विचारांच्या त्याच त्याच वादळात गुरफटताना बऱ्याचदा आपण स्वतःला विसरतो.. भटकत राहतो कुठल्यातरी दूर..अनोळखी वाटेवर..आणि हिंडता हिंडता अचानक उभं ठाकतं ,एक अनपेक्षित वळण!जिथे नुकतीच चालून आलेली वाटसुद्धा परकी वाटायला लागते...कारण वळणावर सापडलेला असतो,तो हरवलेला "मी"! स्वतः हरवत जाताना स्वतःलाच शोधायला प्रवृत्त करणारं असं वळण आयुष्यात कधीतरीच येतं; पण जेव्हा येतं तेव्हा माणूस सगळ्या सुख-दुःखाच्या पलीकडे गेलेला असतो.हा सगळा अद्भुत आणि सुंदर प्रवास..आपल्या घडणीचा !त्या भावनेला शब्दात मांडण्याचा एक छोटा प्रयत्न !
                            इतका वेळ घट्ट मूठ आवळून बसलेले हात आपोआप सैल झाले…
                            सहज हलले ,मागे-पुढे ,पुढे-मागे !
                            पावले उगाच तिरपी तिरपी पडू लागली…
                            बांधलेल्या केसांना सोडवलं ;तेव्हा मोकळं झालं रान…वाऱ्याला !
                            त्याने चांगलंच खेळून घेतलं !
                            मग ओठांवरलं इवलं हासू पसरत गेलं गालावर..पार डोळे मिटेपर्यंत !
                            सुटीवर गेलेले शब्द रुजू झाले ओठांवर,
                            नवी नवी मी
                            खरी खुरी मी
                            जुनीच होते
                            जरी तरी मी
                            गंध मंद मी
                            धुंद छंद मी
                            उधळून ल्याले
                            रंग रंग मी
                            ते तरंग
                            पण मी अभंग
                            अशी स्वतःत झाले
                            दंग दंग मी
                            आता हरण्याला
                            जिंकलेच मी
                            रडगाणे थुंकलेच मी
                            आनंदवस्त्र नेसले तेव्हा
                            शोभले अंग अंग मी
                            मी तेजस्वी
                            मी मनस्वी
                            मी दव इवलासा ओजस्वी
                            एक पाकळी
                            जरा जांभळी
                            मी तिजवरी उतरत
                            जशी वळली हरकत
                            एक सुराची
                            एक सुराची !!

Tuesday, 24 November 2015

"नवलाई "

                             कधीकधी असं वाटतं सगळं सोडून द्यावं !तुम्हाला कधी असं वाटलंय?सगळं! जे काही आता आहे, ते सोडून दूर कुठेतरी ( for example हिमालयात  :P ) जावं.. शांत डोळे मिटून राहावं !कोणताच ताण नको का कसली काळजी नको !नसते विचार तर नकोच नको !मैं और बस मेरी तनहाई !wow !what a feeling !रटाळ चाललेल्या आयुष्याला जराशी गती द्यावी ,नवीन असं काही करावं जे या आधी कधी केलंच नव्हतं !नव्या आनंदात ,नव्या जगात हरवून जावं आणि या जगाचा विसर पडावा !हे जग आणि ते जग वेगळं आहे म्हणजे तरी काय नेमकं !सगळीकडे problems तेच असतात,माणसं तीच असतात. पण change of place तुम्हाला वेगळ्या विचारांच्या लाटेवर तरंगायला मदत करतं . एकाच गोष्टीचे वेगवेगळे पैलू बघायला शिकवतं !आणि त्यातून मिळणाऱ्या संवेदनांवर आयुष्य बहरतं !अशाच रोजच्या तोचतोचपणाला कंटाळलेल्यांसाठी  आज माझी अतिशय बालिश कविता !Actually आहे ते सगळं सोडून देऊ हा विचारच मुळात इतका बालिश आहे; मग शब्दांनी त्याच्याशी बालिशपणेच मैत्री करायला हवी नाही का ? :)

असे वाटते मला कधी
वारा सोसाट्याचा यावा
फेकुनी मजला दूरवर
मगच त्याने विसावा घ्यावा

ताऱ्यांनी त्या माथ्याभोवती
गरगरत मला जागे करावे
नव्या जगाचे नवे दरवाजे
दाखवत नभी पसार व्हावे

दारामागाचे गजबच नजारे
नेहमीचे त्यात 'ने' ही नसावे
नवीन वारे नवीन सारे
नव्या मलाही नवे पंख फुटावेत

उडत नव्या पंखांसमावेत
वाऱ्याशी मग पैज लढावी
दटावण्यास येता कोणी
बत्तीशी वेडावत दाखवावी

फांदीवरल्या पक्षासंगे
माझी अगदी गट्टी जमावी
हिंडत रस्ता भर रानामध्ये
आकाशातून  कशी सर पडावी

चिंब होऊन सड्यामध्ये
सारे कसे गंधून जावे
नव्या रसिक श्वासांनी मग
मन माझे तरळून जावे

मनातल्या भावनांचा एकेक
शब्द्पुष्प रचला जावा
गुंफत त्यास दोरीत सुराच्या
पक्ष्याने वाजवावा पावा

अशा गाण्याच्या तालावर वेड्या
मी बेभान नाचत रहावे
बागडून मनसोक्त थकून
मग डोळे मिटून निजून जावे !!

Saturday, 21 November 2015

"श्री गणेशा "

                 आता blog लिहायला घेतलाय खरा; पण कुठून सुरुवात करू प्रश्नच आहे !डोक्याभोवती विचारांचं  वलय गरगरतंय.हे लिहायचंय, ते लिहायचंय ,अरे हो! तेही लिहायचंय...कधी काही वाटलेलं,अनुभवलेलं,जाणवलेलं...कधी कवितेत तर कधी परिच्छेदात उमटलेलं! माझ्या वहीत जपलेल्या अक्षरांना एक नवी वाट आणि काहीतरी productive केल्याचं समाधान.मी Engineering ला आल्यावर लिहायला कधी लागले खरंच मला माहित नाही. शाळेत असताना निबंध लिहायचे रात्री जागून,खूप मन लावून.ते फक्त लिहून ठेवायचे नाही,तर उगाच वाचायचे.. पुन्हा पुन्हा! आणि दुसऱ्या दिवशीं वाचून दाखवायचा कार्यक्रम असायचा.  या सगळ्यात किती आनंद होता! खरोखर एक समाधान होतं , खरं सुख होतं. मराठी दहावीत संपलं आणि माझा छंद.... संपला ?नाही! लपून होता इथेच.. मनाच्या खूप जवळ... आनंद शोधाताना काहीतरी missing असल्याची जाणीव मनात घर करून होती. याने आतून मला भ्वाक केलं आणि मी दचकून जागी झाले. हा आनंद पुन्हा मिळवण्या सारखा दुसरा आनंद असूच शकत नाही :) ! काही औरच गोष्ट आहे ही! का करायचं हे?

विचारांचा परिच्छेद संपतो,रितेपणाच्या पूर्णविरामात…
वळणावर चालण्याची अपेक्षा
वर्तुळ  संपल्यावर स्तब्ध उभी असते .. माझ्यासारखीच !
तरी मला लिहायचं असतं , घाटाघाटातून फिरायचं असतं,
रित्या स्तब्धतेत आणि स्तब्ध रितेपणात  :)
तरंगणाऱ्या अक्षरांना द्यायचे असतात
मात्रे , उकार काही वेलांट्या.. माझ्या आवडीच्या
जोडायचं असतं चार टोकांच्या चार शब्दांना,
एका ओळीत जरा आडोशाला!
त्या अक्षरांना ओळीचा आणि मला त्यांचा
काही नाही… फक्त आधार ! :)